Manish Jadhav
चांदा किल्ला हा चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा असून तो गोंड राजवंशाच्या पराक्रमाची साक्ष देतो. या किल्ल्याची निर्मिती गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांनी 15व्या शतकात सुरु केली आणि पुढे धुंडीया रामशाह यांच्या काळात त्याचे काम पूर्ण झाले.
हा महाराष्ट्रातील अशा दुर्मिळ किल्ल्यांपैकी एक आहे, ज्याची तटबंदी संपूर्ण जुन्या चंद्रपूर शहराला कवेत घेते. या तटबंदीची लांबी सुमारे 15.5 किलोमीटर असून ती आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत आहे.
किल्ल्याला चार मुख्य प्रवेशद्वारे आहेत, ज्यांना 'वेस' म्हटले जाते: जटपुरा वेस, बिनबा वेस, पठाणपुरा वेस आणि विठ्ठल मंदिर वेस. या वेसी आजही चंद्रपूर शहराची ओळख टिकवून आहेत.
प्रवेशद्वारांशिवाय या किल्ल्याला 5 खिडक्या (चोर दरवाजे) आहेत. लष्करी हालचाली आणि गुप्त हालचालींसाठी या खिडक्यांचा वापर केला जात असे. बगड खिडकी आणि हनुमान खिडकी या त्यापैकीच काही प्रमुख खिडकी आहेत.
किल्ल्याच्या तटबंदीबाहेरुन खोल खंदक खोदलेले होते. एकेकाळी या खंदकात पाणी असायचे, ज्यामुळे शत्रूला किल्ल्यावर अचानक हल्ला करणे जवळपास अशक्य व्हायचे.
किल्ल्याच्या भक्कम भिंतींवर सुमारे 30 हून अधिक बुरुज आहेत. या बुरुजांवरून तोफा डागण्याची सोय होती, ज्यामुळे लांबून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवणे सोपे जात असे.
किल्ल्याच्या आत पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आणि तलावांचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. आजही किल्ल्याच्या परिसरात असलेल्या प्राचीन वास्तू गोंडकालीन प्रगत स्थापत्यशास्त्राची ओळख करुन देतात.
1818 मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धाचा हा किल्ला साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या भिंतींवर आजही युद्धाच्या खुणा पाहायला मिळतात. विदर्भातील पर्यटन आणि इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.