Manish Jadhav
भटनेर किल्ल्याची निर्मिती साधारणपणे तिसऱ्या शतकात, म्हणजेच इ.स. 285च्या सुमारास झाली असे मानले जाते. तब्बल 1700 वर्षांपेक्षाही जुना असलेला हा किल्ला भारताच्या इतिहासातील सर्वात जुन्या जिवंत वास्तूंपैकी एक आहे.
या ऐतिहासिक किल्ल्याचे निर्माण जैसलमेरचे राजे आणि यदुवंशी भाटी राजपूत 'राजे भूपत सिंह' यांनी केले होते. राजा भूपत यांच्या नावावरुनच या किल्ल्याला 'भटनेर किल्ला' (भाटींचे नगर किंवा किल्ला) असे नाव पडले.
भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला राजस्थानच्या अगदी उत्तर भागात आहे. मध्य आशियातून भारतात येणाऱ्या परकीय आक्रमकांना रोखण्यासाठी हा किल्ला पहिली ढाल ठरायचा. म्हणूनच या किल्ल्याला 'उत्तर भड किवाड' म्हणजेच 'उत्तर सरहद्दीचा रक्षक' अशी ऐतिहासिक पदवी मिळाली.
इ.स. 1398 मध्ये क्रूर परकीय आक्रमक तैमूरलंगने या किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकला होता. त्याने आपल्या 'तुझुक-ए-तैमूरी' या आत्मचरित्रात लिहिले की, "मी संपूर्ण हिंदुस्तानमध्ये भटनेरसारखा इतका मजबूत आणि अभेद्य किल्ला दुसरा कोणताही पाहिलेला नाही."
या किल्ल्याचे सामरिक महत्त्व ओळखून मुघल सम्राट अकबरानेही यावर ताबा मिळवला होता. अकबराच्या काळात त्याचा प्रसिद्ध सेनापती आणि बिकानेरचे राजे 'रायसिंह' यांनी या किल्ल्याची डागडुजी करुन त्याचे महत्त्व अधिक वाढवले होते.
भटनेर किल्ल्याची रचना स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्याला सुरक्षिततेसाठी तब्बल 52 मोठे बुरुज बांधण्यात आले होते. पूर्णपणे पक्क्या विटा आणि चुनखडीच्या साहाय्याने बांधलेली याची तटबंदी आजही पर्यटकांना थक्क करते.
इ.स. 1805 मध्ये बिकानेरचे महाराज 'सूरत सिंह' यांनी भाटी राजपुतांचा पराभव करुन हा किल्ला जिंकला. त्यांनी ज्या दिवशी हा किल्ला जिंकला, तो दिवस 'मंगळवार' होता. मंगळवार हा हनुमानजींचा वार मानला जात असल्याने, त्यांनी भटनेरचे नाव बदलून 'हनुमानगढ' असे ठेवले, जे आज राजस्थानमधील एक प्रमुख शहर आहे.