Manish Jadhav
रणथंबोर किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. 10व्या शतकात बांधलेला हा भव्य किल्ला ऐतिहासिक वास्तुकला आणि राजपुताना वैभवाचे जिवंत प्रतीक आहे, जे इतिहासप्रेमी पर्यटकांना आकर्षित करते.
हा किल्ला रणथंबोर नॅशनल पार्कच्या (व्याघ्र प्रकल्प) अगदी मध्यभागी एका डोंगरावर स्थित आहे. किल्ल्यावरुन सभोवतालच्या घनदाट जंगलाचे आणि तलावांचे विहंगम दृश्य दिसते. इतिहास आणि वन्यजीव एकाच ठिकाणी अनुभवण्याची ही दुर्मिळ संधी आहे.
किल्ल्याच्या आत जगातील एकमेव 'त्रिनेत्र गणेश' (तीन डोळे असलेले गणपती) मंदिर आहे. या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व असून, दररोज देशभरातून हजारो पर्यटक आणि भाविक येथे दर्शनासाठी तसेच लग्नाची पहिली पत्रिका अर्पण करण्यासाठी येतात.
नॅशनल पार्कमध्ये सफारी करताना तर वाघ दिसतातच, पण नशीब बलवत्तर असेल तर किल्ल्याच्या तटबंदीवरून किंवा जाण्या-येण्याच्या रस्त्यावरही पर्यटकांना वाघांचे दर्शन घडते. वन्यजीव छायाचित्रकारांसाठी (Photographers) हा किल्ला एक उत्तम स्पॉट आहे.
किल्ल्याचे विशाल 'नवलखा पोल', 'हाथी पोल' आणि 'गणेश पोल' हे दरवाजे, तसेच हम्मीर कचहरी, बादल महल आणि 32 खांबांची छत्री या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. येथील प्राचीन छतांवरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.
किल्ल्यावरुन खाली असलेल्या पदम तलाव, राजबाग तलाव आणि मलिक तलावांचे विस्मयकारक दृश्य दिसते. या तलावांच्या काठावर अनेकदा वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात, जे दृश्य किल्ल्यावरुन अतिशय सुंदर दिसते.
रणथंबोर किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळ्याचा काळ सर्वोत्तम मानला जातो. या दिवसांत हवामान आल्हाददायक असते आणि किल्ल्याची चढण चढणे सोपे जाते.