Sameer Amunekar
उन्हाळ्यातही दापोलीचे हवामान आल्हाददायक असते. येथील कर्दे आणि मुरुड समुद्रकिनारे पर्यटकांचे आवडते आहेत. वॉटर स्पोर्ट्ससोबतच इथल्या थंड हवेचा आनंद नक्की घ्या.
रत्नागिरीतील गणपतीपुळे हे केवळ धार्मिक स्थळ नसून येथील सोनेरी वाळूचा किनारा अतिशय सुंदर आहे. उन्हाळ्यात संध्याकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारणे सुखद वाटते.
जर तुम्हाला अॅडव्हेंचरची आवड असेल, तर मालवणला नक्की जा. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासोबतच इथल्या निळ्याशार पाण्यात स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा थरार अनुभवता येईल.
मुंबई-पुण्यापासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये मे महिन्यात मोठी गर्दी असते. वरसोली किंवा नागाव बीचवर तुम्ही कुटुंबासोबत 'बनाना राईड' आणि 'जेट स्की'चा आनंद घेऊ शकता.
गर्दीपासून दूर जायचे असेल तर सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला हा उत्तम पर्याय आहे. येथील भोगवे आणि सागरेश्वर किनारे गोव्याच्या किनाऱ्यांची आठवण करून देतात.
स्वच्छ आणि शांत किनारा हवा असल्यास गुहागरला पसंती द्या. येथील हापूस आंबा आणि कोकणी पाहुणचार तुमच्या सहलीची मजा द्विगुणित करेल.
केरळसारखा 'बॅकवॉटर' अनुभव घ्यायचा असेल तर तारकर्लीला पर्याय नाही. मे महिन्याच्या स्वच्छ आकाशात रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी राहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो.