Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून उंबरखिंडची लढाई ओळखली जाते. ही लढाई 1661 मध्ये शिवाजी महाराज आणि मोगल सरदार कारतलब खान यांच्यात झाली.
विजापूरच्या आदिलशाहीने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली पन्हाळगडाला वेढा घातला असता परिस्थितीचा फायदा घेत मोगल सरदार कारतलब खान कोकण प्रांतात उतरला, त्याचा उद्देश कोकणात मराठ्यांचा प्रदेश जिंकून घेणे हा होता.
धूर्त आणि कपटी कारतलब खान महाराजांच्या स्वराज्यावर चाल करुन आला. त्याच्याकडे सुमारे 20,000 हजारांचे मोठे सैन्य होते, ज्यात पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता. हे सैन्य मराठ्यांच्या सैन्यापेक्षा खूप मोठे होते.
कमी सैन्यबळ असल्याने थेट युद्ध टाळून महाराजांनी गनिमी काव्याचा (Guerrilla Warfare) वापर करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या सैनिकांना उंबर खिंडीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या उंच टेकड्यांवर आणि झाडांमध्ये लपवून ठेवले.
जेव्हा कारतलब खानचे मोठे सैन्य खिंडीत शिरले, तेव्हा मराठ्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मोगल सैन्याला माघार घेण्यासाठी जागाच उरली नाही. अरुंद खिंडीमुळे त्यांचे मोठे सैन्य प्रभावीपणे लढू शकले नाही. झाडांमध्ये लपलेल्या मराठ्यांनी बाण, दगड आणि बंदुकीने हल्ला करुन मोगलांना गोंधळात पाडले.
मुघलांचा मोठा तोफखाना आणि घोडदळ या अरुंद खिंडीत निरुपयोगी ठरले. मराठ्यांनी चारही बाजूंनी केलेल्या हल्ल्यामुळे कारतलब खान हवालदिल झाला. त्याने आपल्या सैन्यासह शरणागती पत्करली आणि पळून जाण्यासाठी मराठ्यांकडे विनवणी केली.
कारतलब खानने शरणागती पत्करल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला आणि त्याच्या सैन्याला जीवनदान दिले. महाराजांनी त्यांना सन्मानाने परत पाठवले, पण त्यांना भविष्यात कोकण जिंकण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा दिला.
उंबरखिंडची लढाई मराठा सैनिकी इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या लढाईने सिद्ध केले की, केवळ सैन्यबळापेक्षा योग्य युद्धनीती आणि भौगोलिक परिस्थितीचा योग्य वापर अधिक प्रभावी ठरु शकतो.