Manish Jadhav
बाणकोट हा कोकणातील अत्यंत प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. रोमन भूगोलतज्ज्ञ टोलेमी यांनी आपल्या नोंदींमध्ये याचा 'मँडगोर'असा उल्लेख केला, ज्यावरुन या बंदराचा आणि किल्ल्याचा प्राचीन काळातील व्यापारी इतिहास स्पष्ट होतो.
मराठा साम्राज्यापूर्वी या किल्ल्यावर विजापूरच्या आदिलशाहीचे नियंत्रण होते. इ.स. 1548 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला, परंतु त्यांना येथे दीर्घकाळ सत्ता टिकवता आली नाही आणि पुन्हा हा किल्ला स्थानिक सत्ताधाऱ्यांकडे गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचे महत्त्व वाढले. पुढे पेशवेकाळात, इ.स. 1700 च्या दशकात मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बाणकोटवर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आणि सिद्दीच्या जंजिरा मोहिमेला शह दिला.
कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याची डागडुजी करुन त्याची तटबंदी अधिक भक्कम केली. शत्रूला आव्हान देण्याच्या आणि मराठा आरमाराची ताकद दाखवण्याच्या या मनसुब्यामुळेच या किल्ल्याला 'हिंमतगड' हे ऐतिहासिक नाव देण्यात आले.
इ.स. 1755 मध्ये तुळाजी आंग्रे यांच्याविरुद्ध पेशवे आणि ब्रिटिशांनी हातमिळवणी केली. या संयुक्त मोहिमेत ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीने सुवर्णदुर्ग आणि बाणकोट किल्ल्यावर मराठ्यांच्या मदतीने ताबा मिळवला.
इ.स. 1756 मध्ये पेशव्यांशी झालेल्या तहानुसार, ब्रिटिशांनी बाणकोट किल्ला स्वतःकडे ठेवला आणि त्याबदल्यात सुवर्णदुर्ग पेशव्यांना दिला. हा किल्ला ब्रिटिशांनी दक्षिण कोकणात आपल्या ताब्यात घेतलेली सर्वात पहिली भूमी ठरला.
किल्ला ताब्यात आल्यानंतर ब्रिटिशांनी ब्रिटनच्या राजाच्या सन्मानार्थ याचे नाव बदलून 'फोर्ट व्हिक्टोरिया' असे ठेवले. ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर मिठाच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि एक प्रमुख लष्करी चौकी म्हणून केला.
किल्ल्याच्या इतिहासाशी एक भावनिक प्रसंग जोडलेला आहे. इ.स. 1854 मध्ये मुंबईचे कौन्सिलर आर्थर मालेट यांच्या पत्नी आणि मुलीचा सावित्री नदीत बोट उलटून मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किल्ल्याच्या परिसरात उभारलेले ऐतिहासिक स्मारक आजही त्या काळाची साक्ष देते.