
‘आपल्याला वेळ नाही’ या एकाच सबबीखाली 28 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केलेल्या अर्चना कुमारी यांच्या मृतदेहाचा इंक्वेस्ट पंचनामा करण्यास मुरगाव येथील तत्कालीन वादग्रस्त उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी सात दिवस घालविल्याने शेवटी काल आठव्या दिवशी त्या महिलेची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली.
मंगळवारी हे सोपस्कार पूर्ण झाल्यावर तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. तथापि, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या या असंवेदनशीलतेवर दैनिक ‘गोमन्तक’ने प्रकाशझोत टाकल्यावर सर्व थरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मृत व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळणारा असा असंवेदनशील अधिकारी सेवेत राहणे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठांनी त्यांच्या गलथान कारभाराची दखल घेऊन कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
‘गोमन्तक’ने या विषयावर प्रकाशझोत टाकल्याबद्दल अर्चना कुमारी यांच्या कुटुंबीयांनीही ‘गोमन्तक’चे आभार मानले. समाज कार्यकर्त्या आवडा व्हिएगस यांनी या घटनेचा निषेध करताना महिलांच्या मृतदेहाची अवहेलना करणारा अधिकारी अशा जबाबदार पदावर बसण्यास अयोग्य असून त्यांच्या या कृतीची वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाईची मागणी त्यांनी केली.
जर निपाणीकर कामात व्यस्त होते, तर दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे शक्य होते, असे त्या म्हणाल्या.
म्हणे, मी वास्कोचा कारभार पाहात नाही!
निपाणीकर यांनी पंचनामा करण्यासाठी तीन वेगवेगळ्या तारखा देऊन या मृत महिलेच्या नातेवाईकांचा खोळंबा केला. त्यांच्या या कृतीबद्दल विचारले असता, ‘आम्हाला आणखीही कामे असतात’ असे उद्धट उत्तर त्यांनी दिले होते.
‘गोमन्तक’ने त्यांना याविषयी फोन केला असता, मी आता वास्कोचा कारभार पाहात नाही, असे सांगून त्यांनी फोन बंद केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.