Manish Jadhav
राजस्थानातील अजमेर येथील बिटली टेकडीवर वसलेला तारागड किल्ला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. संपूर्ण राजपुताना प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जयपूर, जोधपूर, मेवाडच्या वाटांवर वर्चस्व गाजवण्यासाठी या किल्ल्यावर कब्जा असणे गरजेचे होते.
11व्या शतकात राजा अजयपाल चौहाण यांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. सम्राट पृथ्वीराज चौहाण यांच्या काळात हा किल्ला अजमेरच्या बलाढ्य सत्तेचे आणि राजपूत अस्मितेचे मुख्य केंद्र बनला.
दिल्लीच्या सुलतानांनी राजपुतान्यावर ताबा मिळवण्यासाठी तारागड किल्ल्यावर अनेकदा भीषण हल्ले केले. अल्लाउद्दीन खिलजीने राजपुताना मोहिमेदरम्यान तारागड जिंकण्यासाठी सैन्याची मोठी फळी तैनात केली होती, जिथे राजपुतांनी प्राणांची बाजी लावून कडवा प्रतिकार केला.
15व्या शतकात मेवाडचे पराक्रमी राजकुमार पृथ्वीराज सिसोदिया यांनी या किल्ल्यावर विजय मिळवला. त्यांनी आपल्या पत्नी 'ताराबाई' यांच्या नावावरुन या किल्ल्याचे नाव 'तारागड' ठेवले.
मुघल सम्राट अकबर आणि जहांगीर यांच्या काळात तारागड हा मुघलांच्या राजपुताना मोहिमांचा मुख्य लष्करी तळ बनला. मुघल सत्ता कमकुवत झाल्यानंतर मराठ्यांनी आणि स्थानिक राजपूत राजांमध्ये या किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी अनेक रक्तरंजित लढाया झाल्या.
18व्या शतकात मराठा साम्राज्याचे बलाढ्य सरदार महादजी शिंदे यांनी तारागड किल्ल्यावर ताबा मिळवला आणि अजमेरमध्ये मराठ्यांची सत्ता स्थापन केली. मराठ्यांच्या काळात या किल्ल्याची तटबंदी अधिक मजबूत करण्यात आली.
14भव्य बुरुज, उंच कडे आणि नैसर्गिक चढणीमुळे तारागड किल्ला जिंकणे अत्यंत कठीण मानले जाई. या किल्ल्यावरील लढायांनी वाळवंटातील सत्तेची गणिते अनेकदा बदलली, ज्यामुळे याला 'राजस्थानचा जिब्राल्टर' म्हणूनही ओळखले जाते.