Manish Jadhav
भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक असलेला चित्तोडगड किल्ला हा मेवाड राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. हा किल्ला फक्त एक बांधकाम नसून राजपुतांच्या गौरव, शौर्य आणि बलिदानाचा तो एक जिवंत इतिहास आहे.
राजस्थानच्या चित्तोडगड शहरात एका 700 फूट उंचीच्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. सुमारे 690 एकरच्या परिसरात पसरलेल्या या किल्ल्याची लांबी 13 किमी आहे. त्याच्या तटबंदी, सात प्रवेशद्वार आणि आत असलेले सुंदर राजवाडे, मंदिरे आणि तलाव याची रचना प्रभावी आहे.
चित्तोडगडच्या इतिहासात तीन मोठ्या 'जोहर'च्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना -अलाउद्दीन खिलजीच्या हल्ल्यामुळे राणी पद्मिनी यांनी इतर स्त्रियांसह जोहर केला. दुसरी घटना- गुजरातचा सुलतान बहादूर शाह याच्या हल्ल्यावेळी राणी कर्णावती यांनी जोहर केला. आणि तिसरी घटना- सम्राट अकबराच्या हल्ल्यावेळी किल्ल्यातील स्त्रियांनी जोहर करुन आपले पावित्र्य राखले.
राणा कुंभा यांनी मालवा आणि गुजरातवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा विजय स्तंभ बांधला. 15व्या शतकातील ही 9 मजली भव्य वास्तू राजपूतांच्या विजयाचे प्रतीक मानली जाते.
राणा कुंभा आणि राणा सांगा यांसारख्या महान राजपुत शासकांनी या किल्ल्यावर राज्य केले. त्यांच्या काळात किल्ल्याची मोठी प्रगती झाली. स्थापत्यशास्त्र आणि कलेच्या दृष्टीनेही त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण इमारती बांधल्या गेल्या.
भक्ती चळवळीतील प्रसिद्ध संत मीराबाई यांनी याच किल्ल्यावर त्यांचे जीवन व्यतीत केले. त्यांच्या भजनांनी या किल्ल्याला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.
1568 मध्ये अकबराने किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर, राजपुतांनी उदयपूरला आपली नवीन राजधानी बनवली. त्यामुळे या किल्ल्याचे राजकीय महत्त्व कमी झाले, पण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून त्याचे महत्त्व आजही कायम आहे.
राजस्थानी स्थापत्यशास्त्र, कला आणि राजपुतांच्या इतिहासाचा गौरव म्हणून 2013 मध्ये या किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला.