Akshay Nirmale
पणजी-फोंडा मुख्य मार्गावरच फोंडा बस स्थानकापासून जवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नुतणीकरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज किल्ला असे या किल्ल्याचे नाव आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला भव्य नाही. तथापि, याच्या रंगसंगतीमुळे लांबूनच हा किल्ला लक्ष वेधून घेतो.
किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.
हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहाने 16 व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करताना या किल्ल्यावरही हल्ला चढविला होता. पण तेव्हा यश आले नाही. तथापि, 1675 साली जोरदार आक्रमणानंतर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.
पोर्तुगीजांनी फितुरीने हा किल्ला परत मिळवला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्यासह हल्ला करून हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला.
मंगेशी, म्हार्दोळ येथील सुप्रसिद्ध मंदिरे या किल्ल्यापासून जवळ आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच खेपेत ही तिन्ही पर्यटन स्थळे पाहता येतात.